Thursday, 9 July 2015

Ahiwant Fort

माझा  आधीचा ब्लॉग  वाचा.
Hatgad Fort हतगड  किल्ला

    अहिवंत किल्ला    


भेटीची तारीख: ९ जुलै २०१५
Day 2: Fort 1


                          सकाळी ६ वा. उठून आम्ही तयार झालो. रूम सोडायला ६.३० झाले होते. आम्ही वणी मध्ये चहासाठी न थांबता हायवे वर चहा घ्यायचे ठरवले. सोबत आम्ही बिस्किटस घेतले होते ते खाल्ले.
सकाळी ७ ला आम्ही पुन्हा पिंपरीपाडा येथे आलो. सचिन व देवराम तयारच होते. त्यांना घेऊन आम्ही पुढे निघालो. थोडे पुढे गेल्यावर कोल्हेर गाव लागते, त्याच्याही पुढे साधारण २-३ किमी. अंतरावर एक गाव लागले. या गावातून सचिन एका जाणकार माणसास घेणार होता. पण तो बाहेर गेला होता. अजुन एका माणसाने सल्ला दिला की या वाटेने (अहिवंत वाडीच्या ) न जाता दरेगांव च्या वाटेने जा. कारण पावसाचे वातावरण होते व खडया चढणीचा रस्ता होता. चढाई अवघड होती. अहिवंत किल्ल्याचा विस्तार खूप मोठा असल्याने तेथे जाण्यास अनेक वाटा आहेत. अहिवंत वाडी या गावातून पण एक वाट आहे. आणि एक वाट दरेगांव मधून आणि तीसरी वाट दरेगांव खिंडीतून जो रस्ता बेलवाडी मध्ये जातो तिथून आहे.
या सर्व वाटांपैकी दरेगांव खिंडीतील वाट सर्वात सोपी आहे. एका गावकऱ्याने तर असेही सांगितले की वाट येवढी सोपी आहे की म्हशी पण याच वाटेने जातात. संदिप त्यांना म्हणाला आम्हाला पण एक म्हस वर न्यायची आहे. so wicked… असो या वाटेने गाडीने बऱ्यापैकी वर जाता येते. त्यामुळे अंदाजे १-२ किमी चढायचे वाचतात. पण आम्हाला पूर्ण गड बघायचा होता. म्हणुन आम्ही दरेगांव येथील वाटेने चढून खिंडीच्या वाटेने उतरायचे ठरवले. अहिवंत किल्ल्याचा आकार इंग्रजी "U" सारखा आहे. आणि बरोबर मध्ये दरेगांव आहे. बहुधा दरी मधील गाव म्हणजे दरीगाव असावे नंतर कालांतराने त्याचे नाव दरेगाव असे पडले असावे.
                  खरतर हे दरेगांव वणीमधून सप्तश्रृंग गडाकडे जाणाऱ्या हमरस्त्यावरच आहे.  पिंपरी पाड्याकड़े जायची गरज नव्हती. पण सचिन आणि देवराम यांना सोबत घेण्याचे आदल्यादिवशी ठरवल्याने  तेथे जावे लागले. शिवाय आमच्या कालच्या योजनेप्रमाणे आम्ही अहिवंत वाडीवरून चढाई करणार होतो, असो.
                  दरेगांवात पोहोचल्यावर गाडी तेथील शाळेजवळ लावून वर जाण्यासाठी लागणारे साहित्य एका बॅगेत भरून चढायला सुरुवात केली. थोडा रस्ता शेता शेतातून  होता. सर्वत्र पोपटी हिरवळ होती. चढण आता खडी होत होती. आम्ही झपाट्याने ऊंची गाठत होतो. आमचा खर तर माझा वेग मंदावत होता. खरतर जी वाट होती ती पाण्याच्या ओहळामुळे बनली होती. शिवाय हलका हलका पाऊस पडला होता. त्यामुळे काही ठिकाणी थोडी निसरडी होती. आजुबाजुला करवंदची जाळी होती. जनावरांचा अपवाद वगळता आमच्या ५ जणांव्यतिरिक्त आजूबाजुला कोणीच नव्हते.
           साधारण २०-२५ मिनिटाच्या चढाई नंतर आम्ही एका छोट्या सुळक्यापाशी आलो. या सुळक्याला डावीकडे ठेवत  पायवाटेने आम्ही आधी थोडे उतरून आणि मग परत दोन सुळक्यांच्या मधल्या घळईतून वर चढलो. वर चढल्यावर आम्ही बरोबर दोन सुळक्यांच्या पायथ्याशी होतो. डावीकडच्या कडयाला वर चढायला पायऱ्या होत्या पण त्या फारच अवघड होत्या. पहिल्या दोन पायऱ्या तर चांगल्या पुरुषभर उंचीच्या होत्या. मी थोडा प्रयत्न केला पण शक्य होत नव्ह्ते. चढले तरी उतरणे तितकेच अवघड होते. वरील काही पायऱ्या तर अगदी अरुंद होत्या आणि शिवाय बाजूला आधाराला पण काही नव्ह्ते. मला एक दोन वेळा सगळ्यांनी थोडे encourage केले. पण तरीही मला जमले नाही चढायला.
पहिली टेकड़ी चढून वर आल्यावर दिसणारा सुळका  

शेवटी मीच त्यांना म्हणाले तुम्ही जा मी नाही येत. सगळे वर गेले. आता मै और मेरी तनहाई.... too filmy ना
पण खरच मी ती शांतता अनुभवली होती. अंगावर शहारा आणणारा वारा होता. समोरच कडा असल्याने वाऱ्याचा पण आवाज घूमत होता. समोरचा कडा खूप राकट भासत होता. मध्येच जोराचा वारा आला आणि मला हलवून गेला. झाडांच्या पानांची पण सळसळ झाली. एखाद्या हॉरर फिल्मचा सीन वाटतोय ना आणि मी त्यातील हिरोईन. फिदीफिदी फिदीफिदि…
            पण खरा सांगायचे तर मी पण थोडी घाबरले होते. मी पुन्हा एकदा सहज पायऱ्या चढायचा प्रयत्न केला. पहिली पायरी कशीबशी चढले पण पुढे चढता येईना. शेवटी मी नाद सोडला आणि वर गेलेल्या मंडळींची वाट बघू लागले. नंतर माझ्या लक्षात आले की मी तिथे डोळे मिटून ध्यान करून निसर्गाशी एकरूप व्हायचा प्रयत्न करायला हवा होता. आमच्या योगा क्लास मध्ये सांगतात तसे just be with yourselves. पण तेवढयात सर्व मंडळी परतली.
            मी त्यांना उत्सुकतेने विचारले वर तुम्ही काय काय पाहिले, मला जाणून घ्यायचे होते मी काय काय मिस केले. संदिपने सांगितले वर तो कडा नसून मोठा टेहळणी बुरुज आहे. वर पाण्याची दोन टाकी आहेत . एका टाक्यात उतरायला छान मोठ्या पायऱ्या आहेत आणि याच टाक्यामध्ये आतल्या बाजूला राहता येईल अशी जागा-गुहा असावी, बहुदा ते टाके नसून पूर्वीचे सैनिकांसाठी निवाऱ्याचे ठिकाण असावे. कारण शक्यतो टाक्यांना पायऱ्या नसतात आणि आतल्या बाजूला जी जागा होती त्यावरून हे स्पष्ट होत होते. आता तिथे माती साचून आतला भाग बुजला आहे त्यामुळे ते टाके आहे असा भास होतो.  तिथेच त्यांना एक बुजलेली एक चोरवाट पण आढळली.त्या मध्ये उतरण्यासाठी सुस्थित अश्या पायऱ्या होत्या परंतु आत मध्ये माती साचली होती आणि चिखल झाला असल्याने आम्ही आत जायचे टाळले. - इति संदीप.
         

डाव्या बाजूच्या बुरुजावरून दिसणाऱ्या (किल्ल्यावरच्या) कातळात  कोरलेल्या पायऱ्या  

बुरुजावरून दिसणारे दरेगावच्या बाजूचे (नांदुरी पर्यंत ) विहंगम दॄश्य 

किल्ला आणि बुरुज यामधील काही क्षणचित्रे 
     


                                    किल्ला आणि बुरुज यामधील बांधकामाचे अवशेष 

                   आता आम्हांला समोरच्या कड्यावर जायचे होते. आम्ही चढून त्या कडयावर गेलो. आम्ही ज्या कडयावर  चढत होतो, तो आधीच्या कडयापेक्षा थोडा ऊंच होता. वर चढल्यावर तो आधीचा कडा एकदम आइसक्रीम कोन सारखा दिसत होता. आम्ही वेगवेगळ्या अँगलने फोटोग्राफी केली. पुढे गेल्यावर अजून एक सरळ कडा लागला. त्यावर चढायला कडयामध्येच कोरलेल्या सुंदर पायऱ्या होत्या. आम्ही सावकाश पायऱ्या चढून वर आलो. आता हळूहळू चढ कमी झाला होता. आम्ही आरामात चढून एका विस्तीर्ण पठारावर आलो होतो. पाऊस नव्हता पण खुप धुके होते. आम्ही धुक्यातून वाट काढत पुढे जात होतो. मधेच थोडे धुके निवळून आजूबाजूचा आणि खालचा परिसर दिसू लागायचा. आम्ही जणू ढगांत नाही तर स्वर्गात असल्याचा आभास आम्हांला होत होता.


किल्ल्यावरील पहिला व अहिवंत वाडीकड़चा कड़ा 

 धुके खूपच दाट होते, संदीपच्या अंदाजाने डावीकडे एक कडा असायला पाहिजे होता म्हणून आही मुख्य वाट सोडून डावीकडे गेलो. आणि बरोबर अहिवंत वाडीच्या दिशेने असणाऱ्या कड्याच्या टोकावर थांबलो. सकाळचे ९.३० वाजून गेले होते. आम्ही तेथेच बसून नाश्ता करायचे ठरवले. वणी मधून आदल्या दिवशीच ब्रेड आणि जॅम आणले होते. आम्ही ब्रेड जॅम खात असतांना वाऱ्यामुळे एक प्लास्टिकची पिशवी उडून कडयावरून खाली उडाली. आम्हांला खुप वाईट वाटले. अजाणतेपणी या ट्रेक मध्ये दुसऱ्यांदा आमच्याकडून प्लास्टिकचा कचरा झाला होता.
           नाश्ता आटोपून आम्ही थोडे पुढे आल्यावर आम्हांला एका पडक्या वास्तुचे अवशेष आढळले. आम्ही आता गडाच्या दुसऱ्या टोकाकडे निघालो होतो. डाव्या बाजूला तटबंदीचे काही अवशेष आढळले. आम्हांला उतरायची वाट उजव्या बाजूला असल्याने संदिपने सचिनला उजव्या दिशेने चालत राहण्याचा सल्ला दिला. मधेच एक तळ लागलं त्याला डाव्या हाताला ठेऊन आम्ही पुढे झालो. धुक्यामुळे वाट सापडत नव्हती. पाऊस बऱ्यापैकी झाला असल्याने सगळीकडे पाण्याचे छोटे छोटे ओहोळ झाले होते.  बरेच इकडे तिकडे भटकल्यावर आम्हाला एक छोटा टेकडी वजा उंचावटा दिसला. तो किल्ल्याचा मध्य होता. परंतु त्याच्या डावीकडून कि उजवीकडून जायचे यात शंका होती, संदीपच्या म्हणण्याप्रमाणे धुक्यात रिस्क नको म्हणून आधी confirm करू कि आपण योग्य वाटेवर आहोत कि नाही. शिवाय सचिन या वाटेने आला नव्हता यामुळे त्यालाही काही माहित नव्हते. म्हणून मग आम्ही पूर्ण उजवीकडे वळून जो पर्यंत कडा लागत नाही तो पर्यंत चालत  राहण्याचे  ठरवले. वाट सापडतीये कि नाही याने आम्ही सगळे जण घाबरलो होतो. शेवटी अजून थोड चालत केल्यावर आम्ही एका कड्यापाशी पोहचलो आणि सगळ्यांच्या जीवात जीव आला. पण आमचा captain (संदीप) खूष दिसत नव्हता, तो म्हणाला आपण दरेगावाच्याच कड्यावर आहोत हे नक्की करू कारण धुक्यामुळे आजूनही खालचे काही दिसत नव्हते. म्हणून त्याने नाईलाजाने मोबाईल मधील  GPS वापराचे ठरवीले. (नाईलाज यासाठी कि आत्तापर्यंत त्याने कधीहि वाट शोधण्यासाठी GPS वापरले नव्हते. Confidence दुसरं काय ). परत इंटरनेट/रेंज मिळेल कि नाही या मुळे अजून सस्पेन्स वाढला. शेवटी एकदाचे नक्की झाले कि आम्ही  दरेगावच्याच कडयावर आहोत. आता या कडयाच्या कडे कडेने जायचे होते.

किल्ल्याच्या मध्यावर असणारे मुख्य अवशेष 


या वाटेकडे चालत असतांना एक म्हशींचा कळप लागला. मी एका म्हशीकडे पाहून सहज म्हणाले की ही म्हैस जरा रोडवलेली दिसतेय. तर ती म्हैस अचानक माझ्या मागे आली. मी धूम पळाले. प्रदीप संदीपला म्हणाला जर ही फ़ास्ट चालली नाही तर तिच्यामागे म्हैस सोडत  जावू आपण… मग बघ कशी पळते. too bad..
तेवढयात संदिपने भर घातली "कोणत्याही स्त्रीच्या अंगकाठीवर टीका करू नये. अगदी ती म्हैस असो की अथवा माणूस." फिदीफिदी पण हे दोघेच…
             असो back too the story. आम्हांला जो रस्ता सापडला होता त्याच्या शेवटी पायऱ्या होत्या पण पायऱ्यांवर काटेरी झुडपे टाकून ठेवली होती. संदिप म्हणाला नक्की हीच वाट आहे ना… सचिन म्हणाला हो, त्याने अजुन माहिती सांगितली की या गावचे/ भागातले लोक पावसाळ्याचे चार महीने गुरे वरच ठेवतात. गुरे गड उतरु नये म्हणून वाटेवर काटे पसरवतात. आम्ही जरा काटे बाजूला करून पायऱ्या उतरू लागलो. आता धुके जरा जर कमी होऊ लागले होते. जरा खाली  उतरल्यावर काही गुहा दिसल्या. पण गावतले लोक त्यांचा वापर गोठा म्हणून करतात. अजुन खाली गेल्यावर थोडी सपाट वाट लागली. थोडे पुढे गेल्यावर पाण्याच्या टाक्या लागल्या. पुढे बरच चाललो नंतर मात्र तिथे लगेच कडा लागला. खाली जायची वाट दिसेना. संदिप आणि सचिन वाट शोधायला गेले. लांबुन आम्हांला अजुन दोन लोक दिसले. आम्हाला वाटले की ते ही आमच्या सारखे ट्रेकर्स असावेत. लवकरच त्यांनी आम्हाला गाठले. ते त्याच गावातील मुले होते. पण एव्हाना सचिनला वाट सापडली. मग आम्ही सगळे मिळून गड उतरु लागलो. काही ठिकाणी वाट थोडी निसरडी होती. थोडे खाली उतरल्यावर उतरणीला करवंदाच्या जाळ्या लागल्या. याच दरम्यान आम्हांला झाडीतून मोर उडत जातांना दिसला. मोर एवढा उंच उडू शकतो हे मी पहिल्यांदाच बघत होते.

   
       काट्यांनी बंद केलेली वाट, उत्तरेकडील सोंडेवरचे पाण्याचे टाके , पच्छिमेकडे दूर धुक्यात दिसणारा अचला


उतरण्याची वाट आणि तेथील गोठा, कड्यात असलेली एक गुहा 


दरेगाव व बिलवडी गावांना जोडणारी खिंड, खिंडीवरून दिसणारी किल्ल्याची सोंड 



 उतरण्याची वाट (बिलवाड़ी मार्गे आलो तर चढण्याची)


            खिंडीवरून दिसणारी किल्ल्याची सोंड 
         
           
              समोरच एक अजुन डोंगर दिसत होता. आणि या दोन डोंगरमधून जाणारी हीच ती दरेगांव खिंड. येथे रस्त्याचे काम चालू होते. आम्हाला वाटले येथूनच उतराचे असेल पण ते नविन भेटलेले मुलांनी उजवीकडचा रस्ता दाखवला. तो रस्ता पुन्हा शेता मधून दरेगांव येथेच जात होत. आता या रस्त्याने आम्ही गावातील डोंगर सोंडेच्या दुसऱ्या टोकाला उतरणार होतो. चढतांना जसा चढ़ जास्त होता तसेच उतरतांना उतारही तीव्र होता. पण ट्रेक मधील आमचा हा चौथा गड असल्याने माझाही वेग जरा वाढला होता. तरी सगळ्यांचा वेग माझ्या पेक्षा जास्तच होता. काही ठिकाणी मी थोडी मागे पडत होते. ५-१० मिनिटांतच आम्ही किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो. पण गाडी कडे पोहोचायला अजुन २ किमी तरी चालायचे होते. रस्त्याने शेतात काम करणाऱ्या बायका आमच्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होत्या. बहुतेक त्या माझ्याकडेच बघत असाव्या. पण तिकडे लक्ष दयायला वेळ कोणाला होता.  १२.३० ला आम्ही खाली पोहोचलो पोटात भुकेने कावळे कोकलत होते. साधारण १ वाजता आम्ही गाडी पाशी आलो. आम्ही आदल्यादिवशीच सचिनला त्याच्या घरी आमची जेवणाची सोय करून ठेवायला सांगितले होते. मग आम्ही पुन्हा पिंपरी अचला येथे आल्या रस्त्याने परत पोहोचलो.

             सचिनच्या घरी आलो. सचिनच्या आईने स्वयंपाक करून ठेवला होता. पण त्या शेतावर गेल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. येवढी भूक लागली होती त्यात अशा ट्रेकच्या ठिकाणी असे घरगुती जेवण मिळणे म्हणजे भाग्यच…
            पोटभर जेवण करून आणि सचिन आणि देवराम यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आम्ही त्यांचा निरोप घेतला.
           आता आमचे पुढील ध्येय होते "मार्कंडेय"…




 
आता पुढील ब्लॉग मधे वाचा आमचा दूसरा गड "मार्कंडेय" . . .

Markendey Fort मार्कंडेय गड (Coming soooonnn.....)


Main page मुख्य पान 

Wednesday, 8 July 2015

Ramshej Fort

॥   किल्ले रामशेज ॥ 

भेटीची तारीख: ८ जुलै २०१५
Day 1: Fort 1

                          आमचे एक स्वप्न आहे महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांना भेट देण्याचे. आम्ही त्या  दिशेने एक पाऊल टाकले आणि नाशिक भागातील किल्ले भेट देण्याचे ठरवले. नियोजित योजनेनुसार  4 दिवसांत 7 किल्ले करायचे  होते. मी, माझा नवरा संदीप, माझी 6 वर्षाची  मुलगी जाई आणि नवऱ्याचा  मित्र प्रदीप ट्रेकला जाणार  होतो. तुमचा विश्वास बसणार नाही पण  नाशिकमध्ये  जवळ जवळ 45 किल्ले आहेत. पण आम्ही फक्त वणी परिसरातील  किल्ले भेट देण्याचे ठरवले. आम्ही नाशिकला  जाण्यास  7 जुलै 2015 रोजी संध्याकाळी  निघालो. 14 नंबरला  ब्रेक घेतला. १४ नंबर ?? थांबा  सांगते , हे गावाचे नाव आहे  नारायणगावच्या पुढे  हे गाव आहे. येथे तुम्हांला खूप छान आणि अस्सल वडा पाव मिळेल. माझा नवरा व मुलगी हे वडापावचे  डाय हार्ड चाहते आहे, पण मला वडापाव फारसा आवडत नसल्याने मी वगळता सर्वानी वडापाव ब्रेक आणि मी चहा ब्रेक enjoy केला. तो मंगळवार असल्याने आम्ही तुलनेने लवकर नाशिकला पोहोचलो. आम्ही नाशिक 10.30 वाजता गाठले. डिनर केल्यानंतर आम्ही आमच्या ट्रेकच्या बॅगा पॅक केल्या. दुर्दैवाने माझी मुलगी आजारी पडल्यामुळे ट्रेकला आम्हाला सामील होऊ शकली  नाही.
सकाळी आम्ही लवकर उठलो आणि तयार झालो. 6.30 वाजता आम्ही रामशेज कडे कूच केले.

चला  आता बघूया  भव्य इतिहास असलेला  आमचा  पहिला किल्ला "रामशेज "

रामशेजचा अजिंक्य इतिहास:
सौजन्य: http://www.sambhajimaharaj.com/ramsej-fort-of-nashik-fought-for-6-years/

प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सिंहगड, प्रतापगड असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे  किल्ले  घनदाट  जंगलात  आहेत, डोंगर  दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. परंतु रामशेज हा किल्ला एका सपाट आणि मोकळ्या  मैदानावर आहे. किल्लाच्या जवळपास झाडी, जंगल देखील नव्हते. डोंगर दऱ्यादेखील नव्हत्या. रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड परंतु तो देखील ८ कोस अंतरावर होता. हि सर्व परिस्थिती पाहता किल्ला अगदी एकाकी होता.
ह्याच किल्ल्यावर चांदसितारा  फडकवावा आणि त्या नंतर त्र्यंबक, अहिवंत, मार्कंडा, साल्हेर असे किल्ले जिंकून घ्यावेत असा औरंगजेबाचा मनसुबा होता. औरंगजेबाने आपला सरदार शहाबुद्दीन खान याला हा किल्ला जिंकण्यासाठी पाठवले. शहाबुद्दीन किल्ला घेण्यासाठी चालून आला. त्याच्या सोबत १० हजाराची फौज होती आणि अफाट दारुगोळा आणि तोफा होत्या. त्यामुळेच औरंगजेबाच्या सरदाराला वाटले कि हा किल्ला आपण ताबडतोब काबीज करू. त्याने औरंग्याला सांगितले होते कि, मी एक  दिवसात किल्ला घेतो म्हणून.किल्ल्यावर फक्त ६०० मावळे होते. किल्ल्यावर सूर्याजी जेधे नावाचे किल्लेदार होते. हे मुळचे मावळातले. ते धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते. सूर्याजी जेधे रामशेज च्या तटावरून फिरत राहायचे. दिवसा आणि रात्रीही. ते कधी झोपायचे हेच कोणाला माहित नव्हते. किल्ल्यावर तोफा नव्हत्या.
संभाजी राजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवला होता. किल्ल्यावरच्या किल्लेदाराने आणि मावळ्यांनी लाकडाच्या तोफा बनवल्या. लाकडाच्या तोफांना जनारावरांचे कातडे लावून तोफा बनवल्या. आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळ्यांचा मारा सुरु केला. या आक्रमणाने शहाबुद्दीन खान पार गांगारून गेला. ५ महिने झाले पण तरीही किल्ला काही जिंकता आला नाही.
 मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण किल्ला तर जिंकायचा होता. मग त्याने आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली. सगळी लाकडे जमा केली. आणि लाकडी बुरुंज बनवला (याला लाकडी दमदामा असेही म्हणतात) तोही इतका उंच कि किल्ल्याच्या उंचीचा. हा लाकडी बुरुंज कशासाठी ? तोफा या लाकडी बुरुंजावर नेवून ठेवायच्या आणि मग तिथून किल्ल्यावर तोफा डागायच्या. ५० तोफा आणि ५०० सैनिक बसतील एवढा मोठा बुरुंज बनवला. या लाकडी बुरुंजावरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले. मराठे सुद्धा या लाकडी बुरुंजावर तोफगोळे डागत होते. मोठे घनघोर युद्ध चालू होते. मराठे मागे सारायला तयार नव्हते. शहाबुद्दीन च्या हाती यश येत नव्हते.

२ वर्षे झाली, इतके करूनही रामशेज किल्ला अजिंक्यच राहिला.

मग मात्र औरंग्या ने शहाबुद्दीन ला परत बोलावून घेतले. त्याने रामशेज ची हि मोहीम सोपविली फतेह खान नावाच्या जिगरबाज सरदारावर. आणि मग फतेह खान २० हजारीची फौज घेवून आला. आणि त्याने रामशेज वर जोरदार आक्रमण चढवले. पण तरीही मराठे काही माघार घेईनात. मोगल सेना किल्ल्याच्या जरा जरी जवळ आली तरी किल्ल्यावरून मावळ्यांच्या गोफणीतून धडाधड दगड गोटे सुटायचे, हे दगड इतके जोरात यायचे कि बरेचसे सैनिक जागेवरच ठार  व्हायचे. त्या फतेह खानाला मावळे तसूभरहि पुढे सरकू देईनात. फतेह खानच्या सैन्याला सळो कि पळो करून सोडले या मरहट्ट्यान्नी. इतका खटाटोप करूनही किल्ला काही शरण येईना. फतेह खान हाती फक्त निराशा अपमान आणि माघारच आली.

फतेह खानाच्या तोफांचे गोळे शक्यतो किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण त्यातूनही एखादा तोफगोळा किल्ल्यापर्यंत पोहोचत असे. त्या तोफ्याच्या गोळ्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीची किंवा एखाद्या बुरुंजाची पडझड होत असे. ते पाहून फतेह फार खुश व्हायचा. पण रात्र सारून सकाळ झाली कि ती पडझड झालेली तटबंदी किंवा बुरुंज परत बांधून झालेला असायचा. ते  दृश्य पाहून फतेह खान  आश्चर्यचकित व्हायचा मग मात्र त्याचा राग अनावर होत होता. किल्ल्यावरचे मावळे, लहान मोठी सगळी माणसे अपार कष्ट करून एका रात्रीतच हि पडलेली तटबंदी पुन्हा बांधून काढायचे. परंतु फतेह खानाला मात्र वेगळाच संशय यायला लागला, त्याला वाटू लागले कि या मरहट्ट्यानां जादूटोना येतो, भुताटकी येते, आणि म्हणूनच संध्याकाळी पडलेली तटबंदी सकाळपर्यंत परत आहे तशी सुस्थितीत असायची.

अनेक महिने सरले, हजारो मुगल सैनिक मारले गेले, खुपसारा दारुगोळा हकनाक वाया गेला, तरीही किल्ला हाती यायचे नाव नव्हते. मग एके दिवशी फतेह खानच्या एका सरदाराने फतेह खानाला सांगितले कि युद्ध तर करून बघितले, आता एका मांत्रिकाला बोलावून बघा. फतेह खान ला हे पटले नाही, पण किल्ल्या जिंकण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. मग त्याने आपल्या सरदारा कडून मांत्रिकाला बोलावून घेतले. मांत्रिक आला, तो फतेह खान ला म्हणाला, “हुजूर, चिंता मत करो, मैने तो भूत प्रेत भी वश किये है, ये मरहट्टे क्या चीज है? आप बस मुझे एक सोने का नाग दे दिजीये बाकी मी संभाल लेता हु”  मग त्या मांत्रिकाने मागितल्या प्रमाणे त्याला सोन्याचा नाग बनवून देण्यात आला.

मांत्रिकाने तो सोन्याचा नाग आपल्या छातीजवळ धरला आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्या जवळ जायला निघाला. मांत्रिक पुढे आणि फतेह खानाचे  सैन्य त्याच्या मागे. मांत्रिक किल्ल्याचे दिशेने पुढे सरकत होता. तो जसा किल्ल्याच्या जवळ आला तसा किल्ल्या वरून गोफणीचा एक दगड जोरात मांत्रिकाच्या अंगावर आला. त्याचा तडाखा इतका जोरदार होता कि नाग एकीकडे आणि मांत्रिक दुसरीकडे जावून पडला. फतेह खान चे सैन्य पाठीला पाय लावून छावणीच्या दिशेने जोरात पळत सुटले.

फतेह खानने अजून एक डाव आखला, त्याने मध्य रात्रीच्या वेळी किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याच्या दिशेने तोफांचा जोरदार मारा सुरु केला. या तोफांचा आवाज खूप जबरदस्त होता. त्या आवाजाने किल्ल्यावरचे सगळे मावळे मुख्य बुरुंजाजवळ येवून फतेह खानची करामत बघत होते. पण किल्ल्यावर एक पण तोफ गोळा पोहोचत नाही हे पाहून त्यांना हसू येत होते. जवळपास सगळ्या तोफा किल्ल्याच्या दिशेने आग ओकत होत्या. पण फतेह खान मात्र त्या तोफांच्या जवळ नव्हताच. कारण तो होता एका वेगळ्याच बेताच्या तयारीत. त्याने आपल्या सोबतीला काही निवडक मोगल सैनिक घेतले आणि तो निघाला किल्ल्याच्या मागच्या दिशेने. दबक्या पावलांनी, बिलकुल आवाज न करता. किल्ल्याच्या मागच्या दिशेला पोहोचल्यावर फतेह खानाने आपल्या सैनिकांना आदेश दिला, “उपरवाले का नाम लो और उपर किले पार चढो, अगर कामयाब हो जोगे तो तुम्हारा नाम होगा” वर जायला कोणी तयार होत नव्हते, पण फतेह खान सुद्धा माघार घ्यायला तयार नव्हता, मग त्यातले काही सैनिक जीवावर उदार होवून किल्ल्यावर चढाई करायला तयार झाले. अंधाराचा फायदा घेवून झाडा झुडपाच्या सहाय्याने ते हळूहळू वर चढू लागले. त्यांनतर एका मागोमाग एक असे बरेचसे सैनिक वर जावू लागले.

एकंदरीत फतेह खानाचा बेत असा होता कि, किल्ल्यावरच्या मावळ्यांना पुढच्या बाजूने तोफगोळ्या मध्ये गुंतवून ठेवायचे आणि मग काही निवडक मोगल सैनिकांना किल्ल्यावर पोहोचवायचे. आणि मग दोरखंड लावून खाली उरलेले सगळ्या सैनिकांनी किल्ल्यावर जायचे आणि किल्ला काबीज करायचा. ठरल्याप्रमाणे किल्ल्याच्या मागे फतेह खानाचा बेत किल्ल्याच्या मागच्या बाजून चालू होता. किल्ल्यावर किल्लेदार सूर्याजी जेधे पुढच्या बाजूला मुख्य बुरुंजाजवळ होते. ते आणि त्यांचे सर्व मावळे फतेह खानच्या तोफांच्या करामती बघत होते. पण ते संभाजी राजांचे पराक्रमी सरदार होते, अशाही परिस्थितीत गाफील राहणारे ते नव्हते. २ गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या, त्या म्हणजे एक तर आज अचानकच फतेह खानाने रात्रीचा मारा सुरु केला आहे आणि दुसरे म्हणजे तोफांचे एकपण गोळा किल्ल्याच्या डोंगरावर पडत होते, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतय. मग ते तडक घोड्यावर बसले आणि तडक निघाले, आपल्या सोबतीला त्यांनी २०० मावळे घेतले, त्यांनी स्वतःहून किल्ल्याच्या सर्व बाजूने पहारे देण्यास सुरुवात केली. ज्या वेळी ते किल्ल्याच्या मागच्या बाजूला आले तेव्हा त्यांना रात्रीच्या अंधारात चाललेला फतेह खान चा डाव समाजाला, तसे ते आणि त्यांचे मावळे बुरुंजावर दबा धरून मोगल सैनिकाच्यावर पळत ठेवून बसले.

वर चढणाऱ्या मोगल सैनिकांपैकी एक दोघे तटावर पोहोचले, ते आणखी वर येणार इतक्यात मावळ्यांच्या गोफणीत दगड धरले गेले आणि सप्प करून गोफण चालली, त्या मोगल सैनिकाच्या डोक्यात इतक्या जोरात धोंडा बसला कि तो घायाळ झाला आणि गडावरून खाली पडला. मग मात्र सगळे मावळे धावले तटबंदीच्या जवळ. त्यांनी वर चढणाऱ्या मोगलांवर गोफणीने दगडांचा जोरदार मारा केला, किल्ल्यावरच्या मोठ मोठाल्या दगडी शिळा ढकलून दिल्या. इतकेच नव्हे तर तेलात बुडवलेली कपडे आणि पोती पेटवली आणि त्या सैनिकाच्या अंगावर फेकून दिली. अचानक झालेल्या या मृत्यू तांडवा मुले सगळे मोगल सैनिक जीवाच्या आकांताने ओरडू लागले. काही सैनिक दगडांनी घायाळ होवून मेले तर काही पेटत्या कापडांनी भाजून मेले, आणि उरलेल्या सैनिकांनी त्या उंच डोंगरावून उड्या मारल्या. ते पाहून किल्ल्याच्या खाली उभे असलेले फतेह खान आणि त्याचे मोगल सैन्य जीव मुठीत धरून पळू लागले. गनीम (शत्रू) पळून जाताना बघून किल्ल्यावर मावळे आनंदित झाले, आणि जोर जोरात आरोळ्या देवू लागले, “हर हर महादेव, जय शिवाजी, जय शंभूराजे!!!!”

औरंगजेबाने फतेह खानाला परत बोलावून घेतले. आणि कासम खान ला पाठवले. कासाम खान नव्या दमाची फौज घेवून रामशेज वर चालून आला. कासम खान ने रामशेज किल्ल्याभोवती एकदम कडेकोट पहारे लावले. किल्ल्यावर जाण्यासाठी थोडीसुद्धा वाट मोकळी ठेवली नाही. किल्ल्यावर दारुगोळा आणि अन्न धान्य पोहोचवण्याच्या सगळ्या वाट त्याने रोखून धरल्या होत्या. किल्ल्यापासून काही कोसावर संभाजी महाराजांनी पाठवलेले सरदार रुपजी भोसले, मानाजी मोरे रसद घेवून तयार होते. पण कासम खानच्या त्या कडक बंदोवस्तातून आणि कडेकोट पहाऱ्यातून त्यांना गडावर रसद पोहोचवता येत नव्हती. किल्ल्यावरचे अन्न धान्य संपत आले होते. गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले होते, अन्नावाचून सगळ्यांचे हालहाल होत होते.  हि परीस्थिती पाहता ४ ते ५ दिवसात किल्ला कासम खानच्या हातात जाईल असे वाटत होते. पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला धावून आला. खूप जोराचा पाऊस पडला. हा पाऊस सलग २ दिवस पडत होता. या पावसामुळे किल्ल्याच्या सर्व परिसरात चिखल आणि पाणी झाले होते. किल्ल्याच्या एका बाजूला तर चिखल पाण्यामुळे मेलेल्या जनावारचे मांस साडू लागले. त्यामुळे सर्वत्र खूप दुर्गंधी पसरली होती. इतका घाण वास येवू लागला तो बिलकुल सहन होत नव्हता. त्या वासाने माणसे आणि जनावरे उलट्या करू लागले. मोगल सैनिकांना पहारा देणे खूपच अवघड होवू लागले. मग कासम खानाने त्या परिसरातला पहारा थोडा सैल केला. एका दिवसासाठी तेथील सैनिकांना दुसरीकडे पहारा देण्यास सांगितले.

तो दिवस सरला, रात्र झाली. रात्रहि सरली. दुसऱ्या दिवशी सकाळी पहारे परत पूर्ववत करण्यात आले. तेवढ्यात कासम खानाने किल्ल्यावर पहिले आणि त्याच्या लक्षात आले कि, किल्ल्यावरील मावळे ताजेतवाने दिसत होते, त्याच्या जीवात जीव आला होता. इतकेच नव्हे तर तिथे काही नवीन मावळे हि दिसत होते. कासम खान चक्रावून गेला. मग त्याला त्याची चूक लक्षात आली. आदल्या रात्री दुर्गंधी मूळे त्याने पहारे दिले केले होते, त्याच्याच फायदा घेवून दाबा धरून बसलेली रुपजी आणि मानाजी यांची फौज नवीन रसद, अन्न धान्य आणि दारुगोळा किल्ल्यावर पोहोचवून आले होते. कासम खानाला कळून चुकले कि रामशेज काबीज करणे हे फक्त स्वप्नच राहणार आहे. दिवसा किल्ल्यावरून मरहट्टे मोगलांवर मारा करायचे आणि रात्री संभाजी राजांनी पाठवलेली फौज मोगलांवर हल्ला करायची. किल्ल्याभोवती वेढा टाकलेल्या सैन्यावर आजूबाजूच्या झाडी मधून अचानक हल्ले व्हायचे. मोगालंना सळो कि पळो करून सोडले होते.

कासम खान देखील किल्ला जिंकू शकला नाही. हा किल्ला ६ वर्ष झुंजत होता.

आमची गोष्ट :
किल्ल्याच्या पायथ्याशी आशेवाडी नावाचे गाव आहे. किल्ला पाहुन आम्ही पण मोघलांसारखी चूक केली.   असे वाटले की १० -१५  मिनिटांत आपण किल्ल्यावर असू. पण आम्हाला चांगला अर्धा पाउण  तास  लागला चढायला.  किल्ल्याच्या सुरुवतीचा रस्ता बऱ्यापैकी नीट आहे म्हणजे खरतर ओबड धोबड  पायर्‍या लागतात. थोड़े चढून  गेल्यानंतर एक पाण्याचे टाके लागते.


या टाक्यातुन वर पहिल्यास एक गुप्तवाट दिसते ती थेट किल्ल्यावर जाते. आता नविन उत्खननात एक गुप्तद्वार पण सापडले आहे. हि  वाट त्या द्वाराकडे जाते. किल्ल्याच्या माथ्यावरून आपण हे गुप्तद्वार बघू  शकतो.  आम्ही या वाटेने  न जाता सरळ  समर्थांच्या शिकवणीनुसार धोपट मार्ग धरला.
मळलेल्या वाटेने गेल्यानंतर  थोडे पुढे एक  गुहा लागते. या गुहेत रामाचे मंदिर आहे.


गुहेच्या एका बाजूला शिलालेख कोरलेला आहे. शिलालेखाचे  पण आता टपरे पडू लागले आहे. आपण आपले हे वैभव टिकवले पाहिजे, असे आमच्या तिघांच्याही मनात आले.  आम्ही मग रामाच्या मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेतले व निघालो. गुहे समोरच्या तुटलेल्या पायर्‍या वरुन थेट गडावर आलो.  तिकडे आम्हाला २ अजुन ट्रेकर्स भेटले. त्यांनी आम्हला गडावरच्या बऱ्याच गोष्टी दाखवल्या.

गडावर गेल्यानंतर आपण गडाच्या पठाराच्या बरोबर मध्यभागी असतो. तिकडून एक वाट गडाच्या दुसर्‍या टोकापाशी घेऊन जाते, तर डावीकडे जाणारी वाट गडाच्या माचीवर घेऊन जाते. आम्ही आधी उजवीकडे गेलो. थोडे पुढे गेल्यावर एक वाट उजवीकडे वळून कड्यापाशी येऊन थांबते. येथेच खाली गडाचा मुख्य दरवाजा आहे. आज दरवाजा मोठ्या प्रमणावर बुजलेल्या अवस्थेत आहे. दरवाजा भव्य आहे. येथुन  पण एक वाट असावी असे  मला  वाटते पण  आता ती कडे  कोसळल्यामुळे नाहीशी झाली आहे.  हा दरवाजा पाहून, फोटो वगैरे काढून आम्ही दूसरी बाजू बघण्यासाठी पुन्हा  मुख्य वाटेलाआलो.





 थोडे वर चढल्यावर एका सपाटीवर  पाण्याची दोन टाकी आणि एक मोठा तलाव आहे. थोडे आणखी वर चढून गेल्यावर एका देवीच्या मंदिरापाशी येऊन पोहोचलो. या मंदिरात नवरात्रात मोठा उत्सव असतो. मंदिराच्या मागच्या बाजूने थोडे डावीकडे खाली उतरल्यावर गडाचा दुसरा गुप्त दरवाजा दिसतो. अन्य २ ट्रेकर्सनी दिलेल्या माहितीनुसार या दरवाज्यातुन सुद्धा गडाला एक वाट होती पण दरड़ी कोसळल्यामुळे आता तिकडे वाट नाही. या दरवाज्यामधून मात्र पायथ्याचे छान दर्शन घडते. आणि फोटोग्राफीसाठी सुद्धा हा पॉइंट सुंदर  आहे. आम्ही या पॉइंट वर भरपूर फोटो काढून पुनः  मंदिरापाशी आलो.
आता आम्हाला दुसऱ्या टोकावर जायचे होते. या वाटेने  जाताना दुसऱ्या टोकाशी दोन पाण्यची टाकी आहेत. जातांना वाटेवर घरांचे पडके अवशेष आढळतात. हा सर्व परिसर पाहून मुख्य दरवाज्यापाशी म्हणजे ज्या दरवाज्याने आम्ही गडावर प्रवेश केला तिकडे परतलो.
येथून डावीकडे जाणारी वाट समोरच्या पठारावर जाते. वाटेत दोन ते तीन पिण्याच्या पाण्याची टाकी आढळतात. पठाराच्या शेवटी एक ध्वजस्तंभ आहे. इकडून  भोरगड म्हणजेच देहेरचा किल्ला,चांभार लेणी हा परिसर दिसतो. थोडे पावसाचे वातावरण असल्याने अधुन मधून खालचा परिसर दिसत होता.  तिकडे आम्ही छोटासा अल्पोपहार केला . आमच्याजवळची केळी आणि  चॉक्लेट्स खाल्ली.  आणि हो कचरा पुन्हा आमच्या बॅगेत भरला. तासभरात गड पाहून आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली. बरोबर ८.३०  ला आम्ही खाली आलो आणि पुढच्या मोहिमेवर निघलो.
आमची पुढची मोहीम होती वणी जवळचा अचला .

चोरवाटे वरून खाली कड्यावर उतरणारी वाटेची पडझड झाली आहे. 

पूर्वेला दिसणारे विहंगम दृश्य 
किल्ल्याच्या वायव्येला असणारी चोरवाट 



आता पुढील ब्लॉग मधे वाचा आमचा दूसरा  किल्ला अचला . . .

Achala Fort अचला किल्ला


Main page मुख्य पान 

Achala Fort

माझा  आधीचा ब्लॉग  वाचा.
Ramshej Fort रामशेज किल्ला 

  ॥   अचला किल्ला   ॥ 

भेटीची तारीख: ८ जुलै २०१५
Day 1: Fort 2


               आता आम्ही आमच्या पुढील मिशन अचलाच्या  दिशेने चालू लागलो.  हा किल्ला वणी पासून थोडे पुढे सापुताऱ्याच्या  दिशेने  आहे. आम्ही रामशेज सोडले आणि एका लहान रस्त्याला लागलो  जो नाशिक-वणी महामार्गाला  जोडत होता. दिंडोरी गावात आम्हाला गरज पडल्यास लागणारी काही औषध घ्यायची  होती. पण दुकाने अद्याप उघडलेली  नव्हती  म्हणून आम्ही वणीमधून औषधे घेण्याचे ठरवले. दिंडोरी नंतर एक लहान टी स्टॉलवर चहासाठी थांबलो. आम्ही चहाची  ऑर्डर दिली. तो माणूस  प्लास्टिक कप मध्ये चहा सर्व्ह  करत  होता. आम्ही त्याला सांगितले की आम्हाला  प्लास्टिक कप मध्ये चहा नको. तेव्हा त्याने काचेच्या कपमध्ये आम्हाला चहा दिला. आणि नेहमीप्रमाणे माझ्या नवऱ्याने संदिपने त्याला प्लास्टिकचा  वापर कसा घातक आहे या वर एक लेक्चर दिले. खर तर ते बरोबरच होते कारण ग्रामीण लोकांना या बाबत जागरूक करणे आवश्यक आहे.  असो, चहा चांगला होता पण गोड होता. मग आम्ही ठरवले की प्रत्येक वेळेस चहाची ऑर्डर देतांना चहा  जास्त गोड नको हे आवर्जून सांगायला हवे. कारण या ग्रामीण भागात चहा फार गोड असतो.
    आम्ही चहा घेऊन वणी गाठले. लागणारी औषधे घेऊन मुक्कामाची विचारपूस केली. एक दुकानदार जो वणीच्या जगदंबा  मंदिरामध्ये  विश्वस्त होता , त्याने सांगितले की जगदंबा मंदिरात एक भक्तनिवास आहे जे  खरोखर स्वस्त आणि सुरक्षित आहे. फक्त त्यासाठी आपल्याला आधि बुकींग करावे लगते. फोन वर पण बुकींग करता येते. आम्ही भेट देणाऱ्या सर्व किल्ल्यासाठी वणी हे मध्यवर्ति आणि  मोठे गाव असल्याने आम्ही वणी मध्येच रहायचे ठरवले आणि पुनः आमच्या ध्येयाच्या दिशेने निघलो.
   वणी पासून 14-15 किमी नंतर  आम्हाला  पिंपरीअंचला हे एक छोटेसे  गाव लागले.  खरतर तिकडूनच आम्हाला उजवीकडे वळायचे होते पण आमच्या ते लक्षात आले नाही. आम्ही पुढे निघून गेलो,  2-3 किमी नंतर आमच्या लक्षात आले की आम्ही रस्ता चुकलो आहोत . सुदैवानेआम्हाला एक जोडपे दिसले आम्ही त्यांना  अचला किल्ल्याचा रस्ता विचारला. त्यांनी आम्हाला पिंपरी गवातूनच उजवीकडे जायला संगीतले. संदिप गाडी पुन्हा माघारी वळवत होता. दरम्यान मी म्हटले  याच रस्त्याने थोडे पुढे हतगड नावाचा एक किल्ला आहे. अचानक संदीप माझ्यावर चिडला आणि म्हणाला ज्या दिशेने जायचेच नाही त्या बद्दल तू मला का सांगत आहेस आणि भांडण सुरु झाले. पण प्रदीपने लगेच मध्यस्थी केली आणि भांडण तिथेच मिटले.
   पिंपरी अंचला मधून उजवीकडे वळल्यानंतर पिंपरीपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लगले. तिथे आम्ही एका मुलाला गाईड बद्दल विचारले,त्याने काही नावे सुचवली पण  संदीपने  त्यालाच  किल्ला दाखवायला येणार का असे विचारले. माझ्या मनात पण अगदी हाच विचार आला होता. तो मुलगा पण तयार झाला त्याने सोबत अजून एका मुलाला घेतले. आम्ही त्याला पैस्यांबाबत विचारले. त्याने पैसे घेण्याचे नाकरले. आम्हाला तो मुलगा चांगला वाटला. आम्ही त्या दोघांना गाडीत बसवले आणि किल्ल्याच्या पायथ्याच्या दिशेने निघालो.
 त्याच्याशी बोलल्यानंतर आम्हाला कळले की तो मॅरेथॉन धावतो आणि त्याने अनेक मॅरेथॉन जिंकल्या सुद्धा आहे. तो हाफ मॅरेथॉन (21Km) फक्त 1 तास आणि 10 मि अर्धा  पूर्ण करतो. आम्ही तिघे पण काही मॅरेथॉन मधे  धावलो आहोत. आमचे विशेषत: माझे १० किमिचे टायमिंग त्याच्या २१ किमी पेक्षाही जास्त आहे. सचिन आणि देवराम ही त्या दोघा मुलांची  नावे  होती. या पैकी सचिन मॅरेथॉन धावायचा. 5 मिनिटांत  आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. खरतर ते एक छोटस जंगलच आहे. आम्हाला मोरांचा ओरडण्याचा  आवाज ऐकू येत होत. देव कृपेने वन्य प्राण्याचा आला नाही. नाहीतर गिर्यारोहणाचा कार्यक्रम रद्द करुन घरी जावे लागले असते.  :)




आम्ही रस्त्याच्या कडेला झाडाखाली जंगलात गाडी पार्क करून चढाईला सुरुवात केली. आता सकाळचे १०.४० झाले होते. आम्ही  थोडे चढून गेल्यावर एका लहान मंदिरापाशी आलो. त्यावर एक पत्र्याचे छप्पर होते. इथून पुढे खडी चढाई होती. मला खूप थकल्यासारखे होत होते आणि मी सारखे ब्रेक घेत होते. आम्ही ६० अंशाहुन अधिक अशी चढाई करत होतो. एका ठिकाणी सर्व पुढे निघून गेले. तसे ते नजरेच्या टप्प्यातच होते. पण पावसाळ्यामुळे पायवाटेवर गवत उगवल्यामुळे नक्की कुठून चढावे ते कळत नव्हते. शेवटी मी संदिपला आवाज दिला. तो पुन्हा माझ्या मदतीसाठी खाली आला. पाऊस पडला नव्हता तरी वाट खूप निसरडी होती. संदीपने मला हाताला धरून वर ओढले पण माझा पाय निसटला आणि मी खाली पडले. सुदैवाने कोणीही पाहिले नाही आणि संदीपजवळ त्या वेळी  कॅमेरा नव्हता अन्यथा त्याने माझा स्नॅप क्लिक केला असता. माझी फजीती होता होता वाचली.
 थोडे पुढे चढून गेल्यानंतर आम्ही एका  लहान गुहेपाशी आलो.  मी गुहेच्या अगदीजवळ गेले नाही कारण तिथे लहान रॉक क्लाइंबिंग पॅच होता आणि मी खूप थकल्यासारखी झाले होते म्हणून मी पाणी ब्रेक घेतला आणि बाकीच्यानी फोटो ब्रेक. पाणी पितांना मी आजूबाजूचा परिसर न्याहाळत होते. किल्ल्याखालचे पाडे अगदीच पिटुकले दिसत होते. संपूर्ण परिसर हिरवागार होता. भाताची पोपटी शेते खुप सुंदर दिसत होती. या सुंदर अचला किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावर एक  ही मोठे झाड नाही तरीही किल्ल्यावर पूर्ण हिरवे आच्छादन आहे. माझ्या कल्पनाविश्वातून भानावर आले तोवर बाकीच्यांचे फोटोसेशन पण आटोपले होते.








गुहेपासून आम्ही पुन्हा चढायला सुरुवात केली आणि आता आम्हाला पायऱ्या लागल्या  होत्या.  या वर शेवाळे असल्याने पायऱ्या चढताना काळजी घ्यावी. पायऱ्या चढून वर गेल्यानंतर आम्ही गडामाथ्यावर १२ वाजता  आलो. विलोभनीय वातावरण होते. आम्ही जवळजवळ ढगात होतो. खूप वारा होता. वर दोन प्राचीन पाण्याचे टाके आहे. त्यापैकी एकात  पाणी भरले आहे आणि दूसरे कोरडे होते. पाण्याच्या टाक्याबद्दल देवरामने सांगितले की या पाण्यात आंघोळ केल्यास त्वचारोग बरे होतात. बरेच लोक इकडे आंघोळीसाठी येतात. त्याची कल्पना आम्हाला तिकडे टाकून दिलेल्या कपड्यांवरून आलीच. आम्हाला तिथे शेंदुर लावलेला  एक मोठा दगड दिसला. सात फुट असा उंच दगड होता तो.  किल्ल्याच्या  सर्व टोकाला जाऊन आम्ही फोटो  क्लिक केले. आम्ही वाऱ्याच्या शक्तिचा अनुभव घेत होतो. वाऱ्यामुळे आम्ही सरळ उभे राहु शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही कड्याच्या अगदी टोकावर जाणे टाळले.
  अचानक तो पाऊस सुरु झाला आणि आम्हाला आसरयासाठी काही न मिळाल्याने आम्ही चिंब भिजलो. जरा सर ओसरल्यावर आम्ही किल्ल्याचे दूसरे टोक बघायला निघलो. आम्ही जवळचे काही चॉकलेटस  खाल्ले. सचिन आणि देवरामला आम्ही या किल्ल्याचा इतिहास विचारला. त्यांनासुद्धा तो माहित नव्हता. पण त्यांनी हे सांगितले की शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत लुटून आणली तेव्हा ते याच डोंगर रांगेतुन गेले होते. शिवाय त्यांनी  सर्व संपत्ती हतगड या किल्ल्यावर ठेवली होती. शिवाय त्यांनी अशी माहिती दिली की  किल्ला खरोखर  पाहण्यासाठी खुप चांगला  आहे आणि तुम्ही आजच कव्हर करू शकता. मी रागाने संदीप कडे पाहिले तो माझ्याकडे पाहून हसत होता. किल्ल्यावर पर्यंत गाडी जाऊ शकते असे सुद्धा आम्हाला सांगितले. आम्ही म्हणालो खाली जाऊन बघु.










आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. मला उतराना जरा भीती वाटत होती म्हणून मी जरा लहान पावले टाकत होते. संदीप जाम चिडला माझ्यावर, म्हणाला की तू ट्रेक वर येऊ नको पुन्हा. प्रदीपने खाली उतरतांना पाय कसा टाकावा ते शिकवले नंतर मलाही आत्मविश्वास आला आणि मी पण जोरात उतरू लागले. नंतर आम्ही पुन्हा  मंदिरापाशी खाली आलो. कार पर्यंत पोहोचण्यास जवळपास 15 मि लागणार होते आणि  दुपारचे १.३० वाजून गेले  होते. आम्हाला खूप  भूक पण लागली होती.आम्हाला लंच साठी माझ्या आईने  पॅक करून काही पराठे दिले होते ते खाल्ले. सोबत तिने दिलेले लोणचे, मुरंबा यांचाही आनंद घेतला.
 जेवणानंतर  आम्ही दुपारी २ ला गाडी पाशी पोहोचलो. पुरेसा वेळ शिल्लक असल्यामुळे आम्ही हतगडला पण जायचे ठरवले. एकाच दिवशी तीन किल्ले या विचाराने आम्ही खुप आनंदात होतो.





 पोहोचण्याच्या वाटा 


आम्ही दुसऱ्या दिवशी अहिवंत या किल्ल्याला भेट देणार आहोत असे सचिन आणि देवराम यांना सांगितले.
त्यांना सहज विचारले उद्या आमच्या सोबत येणार का? ते आनंदाने तयार झाले. आम्ही त्यांना दुसऱ्या दिवशीचा लंच आणण्यासाठी विचारले. ते पैसे घ्यायला तयार नसल्याने, आम्ही विचार केला  की  निदान या मार्गाने तरी त्यांना मदत करु शकू. उद्याची भेटण्याची वेळ ठरवून आम्ही त्यांचा निरोप घेतला,

आता पुढील ब्लॉग मधे वाचा आमचा तिसरा किल्ला हतगड . . .

Hatgad Fort किल्ले हतगड


Main page मुख्य पान